*२२ जानेवारी इ.स.१६७७**छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार हुसेनखानाचा पराभव केला.*
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी १६६६
आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेतच १० वर्षानंतर शहाजहानचा मृत्यू. बापाला कैदेत घालून त्याची बादशाही
आपल्या ताब्यात घेणे आणि नंतर त्याला मारणे हा मुघली कार्यक्रम "हरामी औरंगजेबाने" सुद्धा यथोचित पार पाडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी १६७७
छत्रपती शिवरायानी हुसेनखानाचा पराभव केला.
हुसेनखान मियाना, पठाण, जणू दुसरा बहलोलखान अशी त्याची ख्याती. वृत्तीने कजाख, मोठा लढवय्या. जुलमी अधिकारी - मियाना बंधूंच्या अमलाने गांजलेल्या कोप्पळ प्रांतातील रयतेची हाक छत्रपती शिवरायांच्या कानी आली, सरनोबत हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली महाराजांनी फौज रवाना केली. येल्बुर्गा जवळ मोठी लढाई झाली, मराठ्यांच्या तुलनेत पठाणीसैन्य संख्येने जास्त असूनही मराठ्यांनी निकराचे युद्ध केले, 'सहा प्रहरात कुल फौज बुडविली' (सभासद बखर), हंबीरराव, धनाजी जाधव, नागोजी जेधे (कान्होजी जेध्यांचे नातू, सर्जेराव जेध्यांचे पुत्र) आदींनी पराक्रमाची शर्थ केली. लढाईचे पारडे फिरले, हुसेनखान पळून जाऊ लागला, तेव्हा तरण्याबांड नागोजी जेध्यानी आपला घोडा पठाणाच्या हत्तीवर घातला, हत्तीची सोंड कापून, हत्ती जेर केला, घाबरून हुसेन्खानाने सपकन बाण सोडला, बाण नागोजींच्या कपाळातून घुसून हनुवटी फोडून बाहेर आला. बाण काढताच नागोजीनेचे प्राण पंचत्वात विलीन झाले. त्यांची पत्नी गोदुबाई जेध्यांच्या कारी गावी सती गेली. मियाना बंधू कैद झाले. नागोजी जेध्यांच्या हौतात्म्याची बातमी ऐकून महाराज कारी गावी जेध्यांच्या सांत्वनास गेले. प्रतिवर्षी एक शेर सोने देण्याची मोईन केली.(जेधे करीना)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी, १६८२
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांगेत समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड हा किल्ला वसलेला आहे. सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले. १८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींचे निधन याच किल्ल्यावर झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी १६८८
राजश्री संतोजीराजे भोसले
दक्षिण दिग्वीजयाच्यावेळी राजश्री संतोजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाले. व्यंकोजीराजांना पाठविलेल्या पत्रात चिरंजीव संतोजीराजे असा केला आहे.
जेस्विटच्या वृत्तांतात संतोजीराजे एक शुर सेनापती होता असा उल्लेख आहे. व्यंकोजीराजांसोबत मदुरेचे सैन्यसुद्धा संतोजीराजे, रघुनाथपंत हणमंते आणि हंबीरराव मोहिते यांच्याशी युद्ध करण्यास जिंजीत आले. व्यंकोजीराजांच्या सैन्याचा पराभाव होताच संतोजीराजांसोबत मदुरानयकानेही तंजावरला वेढा दिला. संतोजीराजांचा पहिला बेत होता की मदुरानायकाकडून भरमसाट पैसा घेऊन तंजावरचा किल्ला आणि राज्य मदुरानायकाच्या स्वाधीन करावे. परंतु रघुनाथपंतांच्या सल्ल्याने आणि शिवाजी महाराजांच्या पत्राने व्यंकोजीराजांच्या राज्याचा नाश करू नये अशी सूचना मिळाल्यावर संतोजीराजांनी मदुरानायकासोबतचा शब्द मोडला आणि जिंजीला परत निघून गेले.
इंग्रजांच्या सेंट जॉर्जवखारीतून सुरतला पाठवलेल्या पत्रात संतोजीराजांच्या हाताखाली ६००० घोडदळ & ६००० पायदळ होते. तर व्यंकोजीराजांचे ४००० घोडदळ आणि १०००० पायदळ होते. यात व्यंकोजीराजांच्या घोडदळाने कमाल केल्याचा उल्लेख आहे. पण त्यांचे मुसलमानी पायदळ सैरावैरा पळत सुटले.
श्री. गजानन मेहेंदळेंच्या श्रीराजा शिवछत्रपती या ग्रंथात राजश्री संतोजीराजे यांच्या मातोश्री महाराणी नरसाबाईंची तुरळक माहिती आहे. सभासद बखरीत नरसाबाईंचा उल्लेख एक उपस्त्री म्हणून केला आहे. नरसाबाईंनी २२ जानेवारी १६८८ ला बाळंभट उपाध्ये याला लिहून दिलेले एक दानपत्र आहे. त्रिणामल म्हणजे तिरुवन्नमलै प्रांतातील तोरपाड उर्फ नरसांबापूर नावाचे गाव नरसाबाईंनी दान दिले आहे. यात नरसाबाईंनी स्वत:चा उल्लेख “माहाराज राजेश्री शहाजीराजे भोसले यांची स्त्री, राजेश्री संतोजीराजियांची माता, राजेश्री नरसाबाई” असा केला आहे. जिंजी प्रांतातील वीरनम येथुन आंद्रे फायर याने पॉल ऑलिव्हा याला इ.स.१६७८ मध्ये पाठविलेल्या एका पत्रात ‘संताजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावांपैकी एक भाऊ’ असल्याचे म्हटले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी १६९३
जुल्फिकार खानचा पराभव
स्वातंत्र्य लढा संताजी-धनाजीने बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी १७३२
शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत, पेशव्यांचा दरबारच येथे होता. पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी १७३९
मराठ्यांनी शिरगावचा किल्ला जिंकला
नोव्हेंबर १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला. महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला.
जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी पुन्हा शिरगावला वेढा घातला व दिनांक २२ जानेवारी १७३९ रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात आला. १७७२ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. पुढे १८१८ मध्ये शिरगावचा ताबा इंग्रजांकडे गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जानेवारी इ.स. १७७९
इष्टुर फांकडा -
मराठीशाहीमधील तीन फांकडे म्हणजे कोन्हेरराव (एकबोटे), मानाजीराव (शिंदे) व इष्टुर (जेम्स स्टुअर्ट) हे होत. क्याप्टन स्टुअर्टला मराठे लोक त्याच्या शौर्यामुळे मोठया कौतुकाने 'इष्टुर फांकडा असे म्हणत. श्रीमंत रघुनाथराव दादासाहेब पेशवे हे पुण्याची पेशव्यांची गादी मिळविण्याकरिता मुंबईच्या इंग्रजांस जाऊन मिळाले व त्यांचे सैन्य मदतीस घेऊन पुणे दरबाराच्या सैन्याशी लढण्याकरितां इ.स. १७७८ मध्ये बोरघांटामध्ये आले. या युध्दप्रसंगांमध्ये इंग्रजांच्या वतीने जे रणशूर योध्दे प्रसिध्दीस आले, त्यांपैकी क्याप्टन स्टुअर्ट हा एक होय. ह्यावेळी सर्व इंग्रज सैन्याचे अधिपत्य कर्नल इगर्टन हयाच्याकडे असून, त्याने आपल्या सैन्याच्या मुख्य दोन तुकडया केल्या होत्या. व त्यांचे अधिपत्य लेप्टनंट-कर्नल कॉकबर्न व लेप्टनंट-कर्नल के हया दोन नामांकित सेनापतीस दिले होते. हयाशिवाय तलासासाठी पुढे चाल करुन जाणारी बिनीच्या सैन्याची एक वेगळी तुकडी केली होती. तिचे अधिपत्य क्याप्टन स्टुअर्ट हयाजकडे होते. पुणे दरबारच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया केल्या असून त्यांचे सेनाधिपत्य हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे, तुकोजी होळकर, महादजी शिंदे, वगैरे नामांकित योध्दयांकडे होते. हे सर्व सरदार आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते. क्याप्टन जेम्स स्टुअर्ट हा योध्दा फार पटाईत असून, त्यास सर्व रस्त्यांची व घांटनाक्यांची पूर्ण माहिती होती. तो आपल्याबरोबर ग्रेनेडियर शिपायांची एक पलटण व थोडासा तोफखाना घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईहून निघाला व आपटे नदीपर्यंत येऊन तेथून दुसरा मार्ग घेऊनब रघांट चढून वर येऊन पोहोचला. ता.२५ रोजी त्याने खंडाळयाच्या उंच टेकडीवर आपले निशाण लाविले.
क्याप्टन स्टुअर्ट हयाने खंडाळयास बराच मुक्काम केला. मुंबईचे दुसरे सैन्य व तोफखाना ता. २३ दिसेंबर इ.स. १७७८ रोजी पनवेलच्या मार्गाने घांट चढून एकदां खंडाळयास येऊन पोहोचला. इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाला. मराठयांच्या तोफखान्याचे मुख्य सेनापति भिवराव पानसे यांनी तोफा व बाण हयांचा प्रतिपक्षावर दररोज बर्षाव चालविला. मराठयांच्या सैन्यामध्ये नरोन्हा नांवाचा एक फिरंगी गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे. अशा प्रकारची निकराची लढाई चालू असता, क्याप्टन स्टुअर्ट हयाने आपल्या पराक्रमाची शर्थ करुन व शत्रूंच्या तोफांचा भडिमार सहन करुन, कारल्यापर्यंत आपली फौज नेऊन पोहोचविली. त्या योगाने मराठे सेनापतीस त्याच्या शौर्याचा प्रभाव फार अलौकिक वाटून त्यांनी त्याची फार वाहवा केली; व त्यास कोतुकाने “इष्टुर फांकडा” असे अभिधान दिले. मराठयांच्या सैन्यामध्ये इंग्रजी फौजतील ज्या गुप्त बातम्या येत असत. त्यांमध्ये इष्टुर फांकडयाच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल आणि युध्दचातुर्याबद्दल फार प्रशंसनीय उल्लेख असत. त्यामुळे मराठयांच्या सेनापतीसहि इष्टुर फांकडयाशी शर्थीचे युध्द करुन त्यास आपले रणशौर्य दाखविण्याचे विशेष स्फुरण चढले. हया निकराच्या चकमकीमध्ये इष्टुर फांकडयास तोफेचा गोळा लागून तो ता. ४ जानेवारी इ.स.१७७९ रोजी मरण पावला. हया प्रसंगी मराठी सैन्याने “इष्टुर फांकडया शाबास” अशी आनंदचित्ताने शाबासकी दिली.
इष्टुर फांकडयाच्या मृत्यूचे वर्तमान तत्कालीन अस्सल मराठी पत्रांत आढळून येते. त्यामध्ये इष्टुर फांकडयाच्या नावापुढे 'लढाव म्हणजे 'लढवय्या असे विशेषण मराठयांनी लाविलेले दिसून येते. परशुरामभाऊ पटवर्धनांचा कारकून शिवाजी बाबाजी हयाने ता. २२ जानेवारी इ.स. १७७९ च्या पत्रामध्ये पुढील उध्दार काढले आहेत. “मुख्यत्वे श्रीमंतांचे पुण्य विचित्र ? अवतारी पुरुषा त्यासारखे योग घडले. ज्या मॉष्टीनाने मसलत केली, तो घाटावर येताच, समाधान नाही म्हणोन मुंबईस गेला; तेव्हा मृत्यु पावला. इष्टुर फांकडा लढाव, इकडील फौजेचा, कारल्याच्या मुक्कामी गोळा लागून ठार जाहला. कर्णेल के म्हणोन होता, त्यास बाण लागून जेर जाहला. आकारिक (कर्ते) होते त्यांची अशी अवस्था जाहली... .. सारांश, श्रीमंतांचा प्रताप हे खरे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment