३ आॅक्टोबर १६५७"छत्रपती शिवराय" कल्याण भागात पोचले, तिथल्या प्रदेशाचा आढावा घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ आॅक्टोबर १६५७
"छत्रपती शिवराय" कल्याण भागात पोचले, तिथल्या प्रदेशाचा आढावा घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ आॅक्टोबर १६७०
"द्वितीय सुरत लूट" - प्रथम दिन...
छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा सुरत लुटली.
"पेशवे मोरोपंत पिंगळे" आणि "सरनोबत प्रतापराव गुजर" यांच्या समवेत १०,००० घोडदळ व ५००० पायदळ घेऊन दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी पहिल्या सुरत लुटीच्या मार्गानेच आज पोचले.
सुरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर -
"बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ आक्टोबर १६७७
छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर असताना त्यांनी ३ आक्टोबर १६७७ साली चेन्नईमधील काली कम्बल मंदिरात जाऊन देवीची पूजा करून बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली. अगदी दोन दिवस महाराजांनी तेथेच मुक्काम केला. पुढे महाराजापासून प्रेरणा घेऊन तामिळीनी स्वातंत्र्याचा लढा उभा केला. राजांची आठवण म्हणून अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारावर तिथल्या लोकांनी त्यांचा फोटो लाऊन एका दगडावर शिवाजीमहाराज आल्याची नोंद करून ठेवली आहे. चेन्नईमध्ये अनेक मराठा लोक असून त्यांनी 'मद्रास मराठा संघम' नावाची संघटना स्थापन करून त्यांच्याकडून १९ फेब्रुवारीला फार मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. जगाच्या पाठीवर कुठही गेलेतरी राजे हे राजेच होते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ ऑक्टोबर १६८२
सन १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात मराठ्यांची एक सैन्य तुकडी औरंगाबाद पासून ४० मैलावर असलेल्या अंतुर भागात लुटीसाठी गेली होती. तिथला मुघल ठाणेदार अहमद याने मराठ्यांना तोंड दिले. मराठ्यांनीही नेहमीसारखे पळाल्याचा आव आणत पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. पुन्हा १० ते १२ हजार मराठे सैन्य तिथे आल्याचे पाहून अहमद घाबरला, त्याने मुघल छावणीला लिहून पाठवले की मला मदत मिळाली नाही तर मराठे या ठाण्यावर कब्जा करतील आणि मी बरबाद होईन. तेंव्हा शहाबुद्दीनखानाला त्याच्या मदतीला जाण्यास सांगण्यात आले पण मराठ्यांच्या एकाचवेळी अनेक भागात हालचाली सुरू असल्याने त्याला पुन्हा अहमदनगरला जाण्यास सांगितले. त्यामुळे मराठे अंतुर मध्ये शिरले त्यावेळेस अब्दुल अजीजखानाचा मुलगा अबुल खैरखान आपल्या सैन्यासह तिथे पोहोचला आणि त्याने मराठ्यांशी सामना दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ ऑक्टोबर १७३५
अजयसिंग, कमरुद्दीनखान व सादतखान ह्यांचे सख्य करून जयसिंगास यामुळे आपल्या हातचा माळवा जाण्याचे भय वाटू लागले. म्हणून त्याने बाजीरावांशी गुप्त संधान बांधून त्यास सूचित केले की, तुम्ही आमच्या मदतीस आलात तर तुमची व बादशहाची गाठ खान डौरान घालून देईल व या भेटीत बादशहा पेशव्यास नवी जहागिर बहाल करील. या पत्रव्यवहारावरून बाजीराव पेशव्यास कळून चुकले की बादशहास जरब दाखविल्याशिवाय दिल्ली दरबार तडजोडीस तयार होणार नाही. तेव्हा जयसिंगाचे बोलावणे आल्यावरून माळव्याच्या व राजपुतान्याच्या खंडणीचा कायम निकाल लावण्याचे पेशव्यांनी ठरवून ३ ऑक्टोबर १७३५ ला ते शिंदे, होळकर व बाजी भिवराव यांजसह उत्तरेकडे निघाले. ज्यांच्या सरदारांनी मोगली सैन्याची वाताहात केली ते पेशवेच स्वतः स्वारीवर निघाले हे ऐकून उत्तरेतील संस्थानिकांचा थरकाप उडाला. निजामाच्या दरबारातही खळबळ उडाली. बादशाही फौजेच्या मदतीस जाण्याकरिता आपल्या फौजेची व तोफखान्याची निजामाने जलदी चालविली. पण ह्या धावपळीचा परिणाम पेशव्यांच्या छत्राखाली चालू लागलेल्या मराठी सैन्यावर बिलकूल झाला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३ ऑक्टोबर १७७८
यमुना नदीच्या दक्षिणांगास 'सागर'च्या जहागिरीत 'काल्पी'चा भुईकोट होता. हे ठाणे थोरल्या बाजीरावांपासूनच गोविंदपंत खेर उर्फ बुंदेले यांच्या अखत्यारित होते. गोविंदपंत पानिपतावर मारले गेल्याने त्यांचा थोरला पुत्र बाळाजी गोविंद आणि धाकटा पुत्र गंगाधर गोविंद हे जहागीर सांभाळत होते. हेस्टिंग्जच्या फौजेला शिंदे-होळकरांकडून परवाने मिळाले होते. परंतु मुख्य पेशव्यांचे परवाने मिळणे आवश्यक होते. इकडे नानांनी बाळाजी गोविंदास पत्र लिहून कळवले की, कोणत्याही परिस्थितीत लेस्लीला दक्षिणेत उतरू देऊ नका. जर त्याने ऐकले नाही तर सामना करा. अन् नानांच्या अपेक्षेप्रमाणे लेस्लीने ऐकले नाहीच. तो आपली फौज घेऊन सरळ दक्षिणेकडे जाऊ लागला. बाळाजीपंतांनी त्याला एकदा सूचना केली. नानांनीही हेस्टिंग्जला पत्र पाठवले की, तुमच्या फौजा समुद्रमार्गाने जाऊ द्या. आमच्या प्रदेशातून जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. इकडे मे १७७८ मध्ये लेस्ली काल्पिच्या जवळ यमुना उतरून दक्षिण बाजूस येऊ पाहतोय हे कळताच बाळाजी व गंगाधर गोविंद या बंधूंनी जागोजागी आपल्या चौक्या बसवून नाकेबंदी केली. हे पाहताच लेस्लीने काल्पिच्या किल्ल्यालाच मोर्चे लावले आणि किल्ला घेतला. इथेच त्याचे चुकले. तो किल्ल्यात शिरल्याने मराठ्यांनी फासा आवळला. अन् अशाच परिस्थितीत दि. ३ ऑक्टोबर १७७८ रोजी लेस्ली आजाराने काल्पिच्या किल्ल्यातच मरण पावला. त्याच्या जागी हेस्टिंग्जने कॅ. गॉडार्ड या गोऱ्याची नेमणूक केली. परंतु या साहेबांच्या पुण्यप्रतापाने इंग्रजांचे अधिकच नुकसान झाले. कॅ. क्रॉफर्ट, कर्नल पार्कर, मेजर फ्लर्टन इ. ५० इंग्रज आणि ३०० गारदी पाण्याविना तडफडून मेले. शेवटी गॉर्डनने नर्मदा गाठली खरी, पण काल्पि पुन्हा मराठ्यांनी काबीज केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने