घाटगे

घाटगे
 घाटगे घराण्याचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा सोळाव्या वर्षीच हसन गंगू जाफरखान याच्या लष्करात मनसबदार झाला. त्याला मलवडी व ललगुण या दोन महालांची देशगत म्हणजे जहागीर होती. घाटगे घराण्यात अनेक शूर पराक्रमी पुरुष झाले. निजामशाहीचा दिवाण मलिकंबर याने विजापूरवर चढाई केली असताना घाटगे घराण्यातील वावजी व मिटोजी यांनी शर्थ करून आदिलशाहीचे रक्षण केले. त्या वेळी निजामशाहीत भोसले व जाधव ही घराणी व आदिलशाहीत घाटगे व घोरपडे ही घराणी फार पराक्रमी असून ती परस्परात लढाया करून आपापल्या सुलतानांची सेवा करीत असत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना कधी वाटलेच नाही.

ब्राह्मण गुरू
 घाटग्यांचे मूळ पुरुष कामराज यांचे रामेश्वरभट काळे म्हणून एक गुरू होते. ते महा ईश्वरभक्त व मोठे सत्पुरुष होते. त्यांना योगविद्या व मंत्रविद्या वश होती. गंधाक्षता व तीर्थ यांनी ते कामराजांची सर्व संकटे नाहीशी करीत. पुढे काही काळाने घाटगे घराणे जरा खालावले होते. पण लवकरच बावजी झुंजारराव हा शूर पुरुष त्या काळात उदयास आला. ह्यास उदयास आणण्यास परशुराम भट हा तपस्वी ब्राह्मण कारणीभूत झाला. वावजीच्या विनंतीवरून त्याने खटावप्रांती श्रीरामेश्वर मंदिरात मोठे अनुष्ठान केले. तेव्हा श्रींनी साक्षात प्रसन्न होऊन सांगितले, 'विजापुरास जाऊन अंबरखान याची भेट घेणे. तो तुम्हांस इब्राहिम पातशहा जगद्गुरु यास भेटवील. दौलत अक्षयी होईल. चिंता नाही.' त्याप्रमाणे बावजी विजापुरास गेले. पातशहांनी त्यास सात लक्ष होनांची दौलत दिली. कुलगुरू परशुराम भट हे स्वारीत सदैव बावजीबरोबर असत. संकटप्रसंगी त्यास धीर देत व श्रींचा आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण चिंतीत असत. बावजी यांचे पुत्र राजजी यांच्यावर परशुरामभट यांचे पुत्र वेदंभट यांची अशीच कृपा होती. वेदंभटांचे राजजींना हरकामात उत्कृष्ट साह्य असे. एकदा ते राजजींचा पठाण सावकार याच्याकडे, सात दिवस अन्न-पाण्यावाचून, कर्जफेडीसाठी ओलीस म्हणूनही राहिले होते.

मुस्लिम मौलवी
 तपस्वी, योगी, वेदवेत्ते ब्राह्मण आपल्या भक्तांना काय अशीर्वाद देत असत, कसे मार्गदर्शन करीत असत, हे वरील दोन तीन उदाहरणांवरून ध्यानी येईल. याच काळात मुस्लिम मुल्ला मौलवी, अवलिया, शेख हे आपल्या भक्तांना काय आशीर्वाद देत असत, ते पहाणे उद्बोधक होईल. हसन गंगू जाफरखान दिल्लीला एक सामान्य नोकर असताना तेथे शेख निजामुद्दीन या नावाचा एक अवलिया होता. एके दिवशी सुलतान महंमद तबलख त्याच्या दर्शनाला आला होता. तो परत गेला तेव्हा हसन लगेच तेथे आला. त्या वेळी निजामुद्दीन त्याला म्हणाला, 'हिंदुस्थानच्या एका प्रांताचा तू सार्वभौम होणार आहेस. मी जे तुला काही सांगत आहे ते विधिसंकेत म्हणूनच.' दक्षिणेत हसन आल्यावर शेख सिराज जुनैदी याच्याकडे तो गेला; तेव्हा त्याने त्याला उत्तेजन देऊन, 'राजाधिराज, तू सैन्य गोळा कर आणि जिहाद पुकारून, पाखंड्यांचा सर्व प्रदेश इस्लामच्या छायेखाली आण' असा शुभाशीर्वाद दिला आणि गुप्त धन दाखवून, मिरजेच्या किल्ल्यातल्या गुप्त बातम्या पुरवून, नाना प्रकारे साह्य केले. आणि तो किल्ला पडल्यावर, आता तुम्ही आक्रमण चालू ठेवा. विजयश्री तुमच्या बाजूला आहे' असा संदेशही त्याला दिला. सुलतान मुजाहिद याला शेख सिराजुद्दिन याचा असाच आशीर्वाद असे. तेव्हा मुस्लिम मौलवी, अवलिया यांची, आपल्या शिष्यांनी राज्य स्थापावे, सार्वभौम व्हावे, काफरांचा नाश करावा, इस्लामच्या छायेत जग आणावे, अशी प्रेरणा असे, असा आशीर्वाद असे, असे दिसते. (बहामनी राज्याचा इतिहास, डॉ. कुंटे, पृ. १, २६, २७, ३६.)

श्रींचा संदेश !
 या उलट मराठा सरदारांचे ब्राह्मण गुरू त्यांना कोणती प्रेरणा देत असत ते वर सांगितलेच आहे. या ब्राह्मणांच्या कृपेमुळे साक्षात श्रींचे दर्शन घाटगे यांना झाले आणि संदेश मिळाला की 'इब्राहिम आदिलशहाकडे जा. दौलत अक्षयी होईल.' श्रींनी विजापूरची चाकरी करण्याची प्रेरणा दिली, एवढेच नव्हे तर इब्राहम स्वतःला जगद्गुरू म्हणवीत असे, त्यालाही श्रींची मान्यता होती ! काळे रामेश्वरभट, परशुरामभट व वेदंभट असे तीन हिंदू ब्राह्मण सत्पुरुष घाटगे कुळातल्या सरदारांची चिंता वहात असत. पण त्या चिंतेची परमोच्च महत्त्वाकांक्षा आदिलशहा, निजामशहा यांच्या पदरी सरदारी मिळविणे एवढीच होती. सार्वभौमत्व, हिंदुधर्माला आलेली ग्लानी नष्ट करणे, असे विचार त्यांच्या स्वप्नातही कधी आले नाहीत.
 वर सांगितलेले राजजी घाटगे हे विजापूर दरबारी सरदार असता शिवछत्रपतींचा उदय झाला. पण त्यांचे गुरु वेदंभट यांनी, त्यांना महाराजांना जाऊन मिळण्याची प्रेरणा दिली नाही. राजजी अफजुलखानाबरोबर स्वारीत होते आणि शेवटपर्यंत त्यांनी विजापूरशीच आपले इमान राखले. (मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार, द. ब. पारसनीस. मराठा सरदार घराण्यांची माहिती या पुस्तकातून घेतली आहे.)

राजा - किताब
 निंबाळकर, शिरके, घाटगे यांच्याप्रमाणेच म्हसवडचे माने हेही अस्सल मराठा क्षत्रियांचे घराणे होय. त्यातील एक मनुष्य सिदोजी याने, म्हसवड महालाचा अंमलदार सुजातमिया याच्या हाताखाली पराक्रम करून, विजापूर दरबारी प्रवेश मिळविला व बहुत कीर्ती संपादन केली. बेरदचा एक सुभेदार हुशेनशा म्हसवडवर चालून आला. त्या वेळी वणगोजी नाईक निंबाळकर त्याला फितले. पण सिदोजींनी आपले इमान सोडले नाही. त्यांनी बहुत शर्थ करून परचक्र नष्ट केले. तेव्हा इब्राहिम शहाने संतुष्ट होऊन त्यास दरमहा तीनशे होनांची तैनात चालू केली. सिदोजी माने याचे नरसिंहपंत केसकर म्हणून एक साह्यकर्ते होते. त्यांना विजापूर दरबाराने 'विश्वासराव' असा किताब दिला होता. पुढे विजापूरची स्थिती खालावली. त्या वेळी मुस्लिम सरदार हिंदू सरदारांचा द्वेष करू लागले. त्या वेळी अनेक मराठे सरदार औरंगजेबास जाऊन मिळाले. माने कुळातील रघाजी माने हेही त्यात होते. जयसिंग दक्षिणेत शिवाजी महाराजांवर चालून आला. त्या वेळी रघाजी माने यांनी बादशाही सैन्यात विशेष पराक्रम केला. तेव्हा औरंगजेबाने मेहेरबान होऊन त्यास म्हसवड, दहीगाव, कासेगाव, सांगोली, आटपाडी इ. गावांचे देशमुखी वतन दिले. रधाजी माने वारल्यानंतर, नागोजी माने यांनी शिपाईगिरी करून, औरंगजेबाकडून राजा हा किताब मिळविला.

उत्तरकालीन यादव

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...